नेमके काय घडले अंतरवाला सराटी येथे ?--कांही अनुत्तरित प्रश्न
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
अंतरवाला सराटी ता. अंबड जि. जालना येत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील हे शहागड येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चा नंतर अगदी लोकशाही व संवैधानिक मार्गाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी 10 समन्वयकांसह उपोषणास बसले होते.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः श्री एकनाथ शिंदे यांनी श्री मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून बोलताना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेले स्पष्टीकरण आणि उपोषण मागे घेण्याची विनंती हा केवळ वेळकाढूपणा असून यातून काहीच साध्य होणार नाही अशी खुणगाठ मनाशी बांधुन त्यांनी मुख्यमंत्र्यांना उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत मराठ्यांना 50 % OBC मध्ये आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही हे स्पष्ट केले.
आंदोलनाला सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याचे बघून सरकार अस्वस्थ झाले आणि इथेच आंदोलन चिरडण्याचा नेहमीप्रमाणे विचार सरकारने केला. त्यासाठी सरकारी व खासगी अनेक यंत्रणांचा कसा वापर करता येईल याची तपासणी सुरू झाली.
दिनांक 01 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच गावाच्या आजूबाजूला जवळपास 15 कि.मी पर्यंत चोख पोलीस बंदोबस्त लावुन लोकांना अंतरवाला सराटी या गावांत येण्यास मज्जाव घालण्यात येऊ लागला.
जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता, हजारो पोलीस तैनात करण्यात आले होते आणि कित्येक पोलिसांच्या गाड्या चहूबाजूंनी तैनातीत होत्या.
आंदोलकांनी व ईतर ग्रामस्थांनी एवढ्या मोठ्या प्रमाणातील पोलीस बंदोबस्ताबाबत शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली. मात्र जनतेचा उद्रेक होऊ नये यासाठी त्यांना एक मोठे कारण देऊन गाफिल ठेवण्याचा प्रयत्न झाला. *जनतेला फसवण्यासाठी एक खोटी बातमी पोलिसांकडून किंवा काही शासकीय यंत्रणेकडून किंवा काही खासगी यंत्रणेकडून पसरविण्यात आली की स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील यांना भेट देण्यासाठी येणार आहेत म्हणुन एवढा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आला आहे.
मात्र श्री मनोज जरांगे पाटील हे अनुभवी आणि चतुर आंदोलक असल्याने त्यांना पुढील धोका लक्ष्यात आला होता आणि किंबहुना ही सर्व शासकीय यंत्रणा हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा सुगावा लागला त्यांना लागला होता.
शासकीय यंत्रणांनी उपोषणकर्त्यांना तब्येतीची कारणे सांगून दवाखान्यात नेण्याचे खोटे आमिष दाखवण्यास सुरुवात केली. दरम्यान जवळपास शेकडो मराठा भगिनींनी मनोज जरांगे पाटील यांच्या बचावासाठी त्यांना गराडा घातला आणि यामुळे मात्र पोलिसांची दमछाक झाली.
पोलीस चाल करून उपोषणकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी आटापिटा करत असतानाच कुशल,अनुभवी,चतुर, निर्भीड,बहाद्दर मावळा श्री मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःला सुरक्षित स्थळी मात्र त्याच गावात हलवण्याचा निर्णय घेतला आणि त्या मराठा भगिनींच्या मदतीने ते त्या ठिकाणाहून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इच्छित ठिकाणी जाण्यास यशस्वी झाले.
हे बघून मात्र सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा गडबडून गेली आणि गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता आल्याचे अपयश कसे झाकता येईल याच विचारात होते, मात्र त्यांना कोणताही पर्याय सापडत नव्हता.
मनोज जरांगे पाटील हे नेमके कुठे आहेत हे शोधण्यासाठी पोलिसांनी गावातील घरोघरी जबरदस्तीने घुसून शोध चालू केला. लोकांच्या लोकशाही मार्गाने विरोधाला सामोरे जाताना पोलिसांना लाठीमार करण्याचे आदेश वरिष्ठांकडून आले आणि तुफान लाठीमार चालू झाला,अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात आल्या आणि काही ठिकाणी हवेत गोळीबार सुद्धा करण्यात आला.
दरम्यान पोलिसांचा आणि प्रशासनाचा म्हणजेच सरकारचा हा भ्याड कावा तोपर्यंत वाऱ्यासारखा पसरला होता. आजूबाजूच्या गावातील तरुणांनी अंतरवाला सराटी या आंदोलन स्थळाकडे धाव घेतली तेव्हा मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि पोलिसांना माघार घ्यावी लागली.
अश्याप्रकारे लोकशाही मार्गाने आणि संवैधानिक मार्गाने,अतिशय शांततेने चालू असलेले मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्याचा महाराष्ट्रा सरकारचा डाव फसला आणि अख्खा महाराष्ट्र सरकारवर थुथु करायला लागला.
पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचे समर्थन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करणार्या पोलिसांची पाठराखण करतानाच मराठा आंदोलकांनीच दगडफेक केली आणि ही परिस्थिती उद्भवली असा खोटा बोभाटा करण्यास सुरुवात केली.
अंतरवाला सराटी येथे श्री मनोज जरांगे पाटील आणि 10 उपोषणकर्ते बसलेले असताना हे आंदोलन चिरडण्यासाठी झालेला हा शासकीय प्रयत्न सामान्य जनतेच्या मनात उद्भवलेल्या खालील प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल का ?
1) 10 ते 15 उपोषणकर्तेच आंदोलनस्थळी उपोषणाला बसलेले असताना हजारो पोलीस बंदोबस्तासाठी का तैनात केले गेले?
2) स्वतः मुख्यमंत्री उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी येणार आहेत अशी खोटी अफवा कोणी पसरवली?का पसरवली?हे योग्य आहे का ?
3) महाराष्ट्र शासनाला मिळालेले मूठभर स्वार्थी समन्वयक सोबत घेऊन सुद्धा एवढे मोठे आंदोलन होत आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे हे ध्यानात आल्याने ते चिरडण्याचा प्रयत्न केला गेला आहे का ?
4) अगदी लोकशाहीचा मार्ग स्विकारला असताना आणि शांततेत आंदोलन चालू असताना अश्याप्रकारे अमानुषपणे लाठीमार करताना शासनाला लाज वाटली नाही का ?
5) जगाला हेवा वाटेल असे शांततेने मराठी क्रांती मूक मोर्चा काढलेला समाज कधी दगडफेक करू शकतो का ?
6) आत्तापर्यंत जेवढेही फोटो आणि वीडियो फुटेज सोशल मीडिया वर दिसत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी केवळ आणि केवळ पोलीसच लाठीमार करताना दिसत आहेत, महिलांचे डोकं फोडताना दिसत आहेत.
परंतु असा एकही फोटो किंवा एकही वीडियो का दिसत नाहिये ज्यात एखादा तरी समाजघटक हातात दगड घेऊन दगडफेक करताना दिसत आहे. एकही असा पुरावा नसताना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री वारंवार दगडफेक दगडफेक म्हणुन का ओरडत आहेत?
7) गृहमंत्री 12 पोलीस जखमी झाले 12 पोलीस जखमी झाले असे वारंवार सांगताना दिसत आहेत मात्र किती आंदोलक जखमी आहेत याचा थोडा सुद्धा उल्लेख का करत नाहियेत?
8) पोलिसांची पाठराखण केली जात असताना चौकशीत काय सापडणार ?
9) लाठीमार चा आदेश देणारा जनरल डायर कोण आहे?
10) जाणूनबुजून मराठा आरक्षण लांबविण्यात खरा हात कोणाचा आहे ?
11) तथाकथित हिंदुत्ववादी सरकारकडून मराठ्यांवर झालेला हा अमानुष आणि भ्याड लाठीमार शोभनीय आहे का ?सरकार हिंदुत्ववादी नाहिये की मराठा हिंदु नाहिये?
या व अश्या अनेक प्रश्नांचा भडीमार सामान्य जनतेतून होत आहे...!!!
जाहिरात प्रसिद्ध
FASTAG साठी संपर्क साधा. 8408817333
सर्व प्रकारचे FASTAG काढून दिले जातील तसेच update करून घ्यायचा असेल तरी संपर्क साधावा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा