इंदापूर, डॉ. संदेश शहा.
शनिवार, ४ जुलै २६
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारीसाठी नवा हायटेक पालखी रथ तयार करण्यासाठी निरा भिमा सहकारी साखर कारखान्यांकडून पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला. कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी सदर निधीचा धनादेश देहू संस्थांनचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे महाराज व विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे महाराज यांचेकडे पुणे येथे शनिवारी दि. ४ जुलै रोजी सुपूर्त केला.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी गेली अनेक वर्षांपासून वापरात असलेला रथ बदलून चालू पालखी सोहळ्यापासून आकर्षक रथ देहू संस्थानकडून तयार केला जात आहे. यापूर्वीच्या रथ निर्मितीसाठीही मी सहकार मंत्री असताना सहकार्य करण्याचे भाग्य आपणास लाभले होते, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. देहु संस्थांच्या विश्वस्तांशी हर्षवर्धन पाटील यांच्या घराण्याचे पिढ्यानपिढ्या ऋणांनुबंध राहिले आहेत. यावर्षी पालखी सोहळ्याचे देहूहून प्रस्थान दि. ७ जुलै रोजी होणार आहे तर बावडा येथे पालखी सोहळा आल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे निवासस्थानी विश्वस्तांचा परंपरेनुसार सन्मान करण्यात येत आहे.
दरम्यान, पालखी सोहळ्याचा नवीन रथ हा राजस्थानातील कारागिरांकडून सागवान लाकडामध्ये तयार करण्यात आला आहे. जुन्या रथाच्या तुलनेत नवीन रथ हा सुमारे ५०० किलोने वजनास हलका असल्याने ओढण्यास सुलभ झाला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा इंदापूर तालुक्यास आध्यात्मिक पर्वणी ठरला असून या सोहळ्याचे इंदापूर येथे होणारे पालखी सोहळा रिंगण सोहळा सर्व भाविकांच्या आध्यात्मिक ऊर्जा व आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा