*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
मुंबई :-- गेल्या सात महिन्यांत १९५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.
तसेच त्यापैकी १७२ मुलींचा शोध लागला असला तरी २२ मुली अद्याप बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणांमध्ये १९ गुन्हे पोक्सो अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील मुलींच्या बेपत्ता होण्याच्या या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेण्याच्या घटना सर्वाधिक असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.
नवी मुंबई शहरामध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी २०२३ पासून जुलै २०२४ पर्यंतच्या दीड वर्षांच्या कालावधीत सुमारे ६०० अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत झाली आहे.
यात मुलींची संख्या ४०० हून अधिक आहे.
यातील ५६० मुला-मुलींचा शोध घेण्यात स्थानिक पोलीसांना यश आले आहे.
जानेवारी २०२४ ते ऑगस्ट २०२४ या साडेसात महिन्यांच्या कालावधीत दाखल झालेल्या अपहरणाच्या एकूण २८२ गुन्ह्यांपैकी २४८ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यातील १७२ मुली व ७६ मुलांना शोधून पालकांच्या स्वाधीन केले आहे.
*यातील १९ गुन्हे ‘पोक्सो’ अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत*.
उर्वरित ३४ गुन्ह्यांतील अपहरण झालेल्या मुलामुलींचा शोध घेण्याचे काम अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून सुरू आहे.
अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.
नवी मुंबई पोलीसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मागील पाच वर्षांमध्ये अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करून अपहरण झालेल्या मुलामुलींचा शोध घेतला आहे.
अपहरण झालेल्या, परराज्यांत जाऊन राहणाऱ्या मुलामुलींची कुठलीही माहिती नसताना,
शोध घेतला जात आहे.
परंतु तरीही ३४ गुन्ह्यांतील मुला-मुलींचा शोध लागला नसून त्यामध्ये मुलींची संख्या २२ आहे.
*मुलांमध्ये रागाने घर सोडण्याचे प्रमाण अधिक*
मागील साडेपाच वर्षांमध्ये सुमारे ५०० मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून यातील ४७० मुलांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष तसेच, स्थानिक पोलीसांनी शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे.
यातील बहुतांश मुले ही आईवडील अभ्यासावरून रागावल्यामुळे,
खेळू न दिल्यामुळे, परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने किंवा इतर काही किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात घर सोडून गेल्याचे आढळून आले आहे. तर काही मुले मजा-मस्ती म्हणून घर सोडून गेल्याचे तपासात समोर आले आहे.
*झोपडपट्टी भागात अधिक घटना*
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ज्या भागात झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्ती आहे.
अशा भागात अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाचे प्रकार समोर आले आहेत.
रबाळे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे एम.आय.डी.सी., तुर्भे एम.आय.डी.सी. व तळोजा या पोलीस ठाण्यांच्या अन्य विभागांच्या तुलनेत मुलामुलींच्या अपहरणाचे प्रकार अधिक आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले आहे.
या भागात पोलीसांनी विशेष लक्ष देऊन हे प्रकार थांबवण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा