Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

पी एम केअर फंडातून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपये द्या --उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी


 

संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9730 867 448

'शेतकऱ्यांना ताकद आणि दिलासा देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचे सरकार निश्चितपणे करत आहे. मदतकार्य काम वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत; पण उद्धव ठाकरेंनी काय केले, सहलीसारखा एक दिवसाचा दौरा केला. शेतकऱ्यांविषयीचे ठाकरेंचे प्रेम बेगडी आहे,' अशी टीका भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी केली. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले.


शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. शेतकऱ्यांना ताकद आणि दिलासा देण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करीत आहे. उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषद, लाइव्ह करणे यापलीकडे शेतकऱ्यांप्रति कणव नाही. राणाभीमदेवी थाटात यायचे, दोन-चार वक्तव्ये करायची, घोषणा-मागण्या करायच्या या पलीकडे ठाकरे काही करू शकत नाहीत, असा टोलाही दरेकरांनी लगावला.


'पंजाब सरकारने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर केली, तशीच मदत महाराष्ट्र सरकारनेही मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी. त्यासाठी 'पीएम केअर फंडा'तून ५० हजार कोटींची मदत राज्याला द्यावी,' अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.


उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारकडे सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली. 'मराठवाड्यात आकाश फाटले असून, अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र, सरकारने देऊ केलेली मदत अगदी तुटपुंजी आणि शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून, त्यांना संकटातून बाहेर पडायला दोन-तीन वर्षे लागतील.


विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके वाहून गेली आहेत. त्यामुळे सरकारने आता निकष न लावता सरसकट मदत करायला हवी,' अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली. 'पीएम केअर फंडा'त महाराष्ट्रातून खूप पैसा जातो आहे. मग, महाराष्ट्राला निधी मिळत नसेल तर पंतप्रधान कोणाची काळजी करीत आहेत, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. भाजपला प्रशासन चालवता येत नाही, असेही ठाकरे म्हणाले.


'शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी करणे हे जर राजकारण असेल तर मग तसे समजा. कर्जमाफी कधी देणार, असा प्रश्न शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर, मुख्यमंत्री त्याला राजकारण करू नका, असे सांगत आहेत. त्याच्यामागे पोलिस लावले जात आहेत. मग, राजकारण कोण करत आहे,' असा प्रश्न करीत, 'संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही,' असे ठाकरे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा