Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना पाच वर्षांनंतर नीरा नदीच्या पाण्याने शाही स्नान, त्यानंतर महापूजा, समाज आरती व दर्शन रांग

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147


--- जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना पाच वर्षांनंतर नीरा नदीच्या पाण्याने शाही स्नान घालण्यात आले. त्यानंतर महापूजा व समाज आरती करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम संपवून पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने पालखी सोहळ्यास भक्तीमय वातावरणात निरोप दिला. 

  जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी च्या सराटी मुक्कामी पहाटे चार वाजता काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पादुकांच्या चार पूजा संपन्न झाल्या. सकाळी सात वाजता पुरूषोत्तम मोरे महाराज, भानुदास मोरे, अजित मोरे, संजय मोरे, अभिजित मोरे, माणिक मोरे, नितीन मोरे, बापूसाहेब मोरे महाराज, प्रल्हाद मोरे, बाळासाहेब मोरे, रामदास मोरे, अशोक मोरे यांनी परंपरेप्रमाणे पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातले. त्यानंतर नदीतच हजारोंच्या संख्येने जमलेल्या वैष्णवांच्या साक्षीने महापूजा व समाज आरती करण्यात आली. 

    भक्तांच्या व वारकऱ्यांच्या दर्शनासाठी पादुका सराटी येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आले होते. यावेळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, आप्पासाहेब गुजर, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अभय तिडके, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, सुरेश सोनवलकर, सरपंच अनिशा तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे, विस्तार अधिकारी युनूस शेख आदींनी दर्शन घेऊन पादुकांना पुणे जिल्ह्यातून सन्मानपूर्वक निरोप दिला. पालखी सोहळा प्रमुखांच्या वतीने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा फेटा, शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.

     पालखी सोहळा सकाळी आठ वाजता पुणे जिल्ह्यातून नीरा नदीवरील पुलावरून लाखो वैष्णावांच्या व भक्तांच्या साथीने ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकारामच्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाला. सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मदनसिंह मोहिते पाटील, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदींनी तोफांच्या सलामीने स्वागत केले. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला.

चौकट : संतश्रेष्ठ जगतगुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांना पाच वर्षांनंतर नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातले. जुलैचा एक आठवडा संपला व पालखीने पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करूनही पाऊसाअभावी राज्यातील धरणे कोरडी पडलेली आहेत. तर परीसरातही हुलकावणी दिल्याने शेतकरी व भाविकांनी पांडुरंगाला पावसासाठी साकडे घातले आहे. अजूनही नीरा नदी पट्ट्यातील गावात टॅकरने पाणी पुरवठा सुरूच आहे.

फोटो - सराटी ( ता इंदापूर ) येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पादुकांना विधीवत नीरा नदीच्या पाण्याने शाही स्नान घालण्यात आले. समाजआरती व महिपुजा करण्यात आली. 

...............................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा