इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
---- पावसामुळे उजनी व विर धरणातून नीरा व भिमा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामध्ये उजनी धरणातून भिमा नदीत तिसऱ्या दिवशी दहा हजाराने वाढवून ९१ हजार ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तर विर धरणातून नीरा नदीत काल सोडलेला विसर्ग कमी जास्त होत आहे. त्यामुळे विसर्ग सकाळी २५ हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे नरसिंहपूर येथील संगमावर एक लाख २६ हजाराचा विसर्ग वाहत आहे. तर भिमा नदीवरील तीनही बंधाऱ्यासह गणेशवाडी पुल सलग तिसऱ्या दिवशी पाण्याखाली असल्याने यावरील वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. नदी काठावरील शेतातील उभी पिके सलग तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्यात आहेत.
पुणे परिसरातील पावसामुळे वरील धरणे फुल्ल झाल्याने पाणी सोडले जात आहे. तसेच उजनी धरणात वरील धरणातून ७५ हजार क्युसेक्सने पाणी उजनीत येत आहे. त्यामुळे उजनी धरणातून भिमा नदीत ८१ हजार ६०० क्युसेक्सने सोडण्यात येत असलेले पाणी दहा हजाराने वाढवून ९१ हजार ६०० क्युसेक्स करण्यात आले असल्याची माहिती उजनी धरण नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे. उजनीतून विज निर्मितीसाठी १६००, कालवा १६००, बोगदा २००, सिनामाढा उपसा १७५ तर दहिगाव उपसा ८० क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे. पाणी पातळी ४९७.१४० मिटर, पाणीसाठा १२०.९५ टिएमसी, १०६.९४ टक्के भरले असून दौंड येथून उजनी धरणात ७५ हजार क्युसेक्सचा विसर्ग येत आहे.
वीर धरणातून नीरा नदीत काल ५५ हजार क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता. आज सकाळी कमी करून २५ हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे यावरील काही बंधाऱ्यावरील पाणी कमी झाले आहे. परंतु यावरील वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. भीमा व नीरा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे पुन्हा पूरसदृश्य परस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत पाणी घुसणार असल्याने अधिकचे नुकसान टाळण्यासाठी सतर्क रहावे असा इशारा देण्यात आला आहे. जलसंपदा विभाग सोलापूर, धरण नियंत्रण विभाग भिमानगर, धरण नियंत्रण विभाग निरा खोरे - विर धरण व पूर नियंत्रण विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच भिमा नदीवरील गणेशवाडी - गारअकोले यांना जोडणारा पुल आज सलग तिसऱ्या दिवशीही बंदच ठेवण्यात आला आहे. काल सायंकाळी सात वाजल्यापासून दोन ते तीन फूटाने वाहणारे पाणी आज सायंकाळी वाढून ४ ते ५ फुटाने वाहत असून आजही पुर परस्थिती जैसेथेच राहिली आहे. त्यामुळे यावरील वाहतूक अद्यापही बंदच ठेवण्यात आली आहे. तर भांडगाव, टणू, नरसिंहपूर बंधारे आजही पाण्याखालीच गेलेले आहेत. नरसिंहपूर संगम व नरसिंहपूर शेवरे पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. परंतू यावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात आली आहे.
फोटो - गणेशवाडी - गारअकोले पुलावर आज तिसऱ्या दिवशी दहा हजाराने पाणी वाढल्याने पाच फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा