Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

*राज्यातील काही जिल्ह्यांत आजही अवकाळी पावसाचा इशारा!..*--- *अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटामध्ये...*

 *अकलूज- प्रतिनिधी*

         *एहसान मुलाणी*

          *टाइम्स 45 न्यूज मराठी*

              *मो:-9096837451*



मुंबई- राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे फेरबदल दिसून येत आहेत. राज्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या लहरी हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला असून, काढणीसाठी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत राज्यात पावसाची शक्यता कायम आहे. सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या (२६ फेब्रुवारी) देखील यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये ही स्थिती कायम राहू शकते.

गेल्या ४८ तासांत राज्याच्या विविध भागांत पावसाने रौद्र रूप धारण केले. नागपूर, भंडारा, गोंदिया, बीड, परभणी यांसारख्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांत गारपीट झाली असून, सोमवारी झालेल्या या गारपीटमुळे शेत पांढऱ्या चादरीने आच्छादले गेले होते. भिजलेली आणि लोळलेली पिके आता सडण्याच्या मार्गावर आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात विजांच्या कडकडाटात एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीसाठी आलेला गहू, हरभरा (चणा), मका, ज्वारी आणि फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला. पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन बाजारभाव कमी मिळण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, बीड येथे कापूस, तूर आणि इतर पिकांना मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी घरांच्या टिनाच्या छपरांना देखील इजा पोहोचली आहे. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी 'येलो अलर्ट' जारी केला असून, नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारने नुकसानग्रस्त भागांत पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी वेगळ्या राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा