इंदापूर तालुका----प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मो. 8378081147
सिटू प्रणित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचा एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन संपन्न. संघटनेचे अध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल कराड व सरचिटणीस प्रा बी. टी. भामरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर पार पडले. आंदोलनात राज्यभरातून १० हजाराहून अधिक आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. ज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
आश्रमशाळांची वेळ पूर्ववत ११ ते ५ करणे, शाळा व वसतिगृह विभाग वेगळा करणे, रोजंदारी कर्मचारी, कंत्राटी (कला, क्रीडा, संगणक) कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे,“काम नाही वेतन नाही" हे अन्यायकारक धोरण रद्द करून अनुदानित आश्रमशाळातील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे, १० वी व १२ वीचे निकाल कमी लागल्यास घोषित करण्यात आलेल्या अन्यायकारक शिक्षा रद्द करणे, मुख्याध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देणे, आश्रमशाळातील रिक्त पदे भरणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, नवीन आकृतीबंधानुसार रद्द झालेली ६५०० पदे पुनर्जीवित करणे यासारख्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनाला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यापक पाठींबा मिळाला. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री किरणजी सरनाईक. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री कुणालजी पाटील, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री विनोदजी निकोले, महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे आंदोलनस्थळी आवर्जून उपस्थित होते.
तसेच आंदोलनाला कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लेखी पाठींबा जाहीर केला. तर शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहित मागण्यांवर तातडीने सकारात्मक विचार करण्याची विनंती केली आहे. तसेच श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेकभाऊ पंडित (विशेषमंत्री दर्जा) यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना पत्र लिहित विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन आश्रमशाळांची वेळ पूर्ववत ११ ते ५ करण्याची आग्रही मागणी केली. आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांनीही आंदोलनाला लेखी पत्राद्वारे जाहीर पाठींबा दिला आहे तसेच महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, शालेय व्यवस्थापन समिती यांनी आश्रमशाळांची वेळ ११ ते ५ होण्यासाठी जाहीर पाठींबा दिला आहे.
“शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ येणे अत्यंत दुर्देवी असून, आश्रमशाळा शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घडवून देईल, तसेच वेळेचा प्रश्न व इतर समस्या मार्गी लागेपर्यंत मी कायम तुमच्यासोबतच असेन" असे आश्वासन विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलनकत्यांना दिले.
आंदोलन यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सिटू ठाणे विभागीय अध्यक्ष राजेश पाटील व सर्व कार्यकारिणी, प्रकल्प अध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती सोलापूर प्रकल्प सिटूचे उपाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली.
फोटो - मुंबई येथील आझाद मैदानावर १० हजार आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे विराट धरणे आंदोलन संपन्न
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा