टाइम्स 45 न्युज मराठी नेटवर्क
रोज उत्पन्न वाढेल या आशेवर कोणी काय सांगेल ते प्रयोग करून अंगावर कर्ज वाढवून ठेवायचं काम शेतकऱ्यां कडून चालू आहे.
आज यश मिळेल , उद्या नफा होईल , हे केले तर पान रूंद होतात , ते केले तर पांढऱ्या मुळ्या सुटतात , अमुक फवारणी केली की वजन वाढते , अमुक खते घेतली की फुटवे चांगले निघतात. सगळे शेतकऱ्यांची फसवणूक करून पैसे कमावणारे ….
रास्त भाव , हमी भाव , एम एस पी , स्वामीनाथन , रंगनाथन ही मागणी केली की योग्य दर मिळेल , तो आयोग लागू झाला पाहिजे , मग उत्पन्न दिडपट मिळेल. असे ऐकून ऐकून दर वर्षी अनुभव घेत देत फक्त कर्ज वाढत गेले भावा , तुमची पोस्ट वाचली आणि कमेंट करावं वाटल , खरच किती वर्षे हे प्रयोग करत जायचे ?
एक एक प्रयोग फेल गेला की , नशीबाला दोष देत एक एक वावर कधी विकले कळालच नाही.
कर्ज काढून पाण्यासाठी पाईपलाईन केली , घरच औत असल तर नांगरट चांगली होते.. ट्रॅक्टर घेतला , शेणखता साठी जनावर केली , शेतीला जोडधंदा असावा म्हणून कोंबड्या - शेळ्या कर्ज काढून घेतली…..
कुणी सांगीतलं
शेततळ काढा ,
कुणी सांगीतलं
ड्रिप करा ,
मिरची लावा ,
कापुस लावा ,
भुईमुंग लावा ,
धान लावा ,
सोयाबिन लावा ,
द्राक्षे लावा ,
केळी लावा ,
डाळींब लावा ,
पपई लावा ,
वांगी लावा ......
सगळे उद्योग थांबले फक्त वाढल ते कर्ज .!!!
सरकार कडून मिळाली सवलत फसवी , दररोज चारा घालून वाढवलेल्या बोकडावर जस कापण्यासाठी अंगावर मांस वाढण्याची वाट पाहात सांभाळले जाते , तसे शेतकऱ्यांना बघण्याची सगळ्यांची दृष्टी !
खतवाला ,
औषधवाला ,
बॅंकवाला ,
सावकार ,
आडत्या ,
साखर कारखानदार ,
दुध संघवाला ,
सगळे शेतकऱ्यांची कापायला येण्या पुरतीच मदत.
शेतकरी मोठा व्हावा ही कोणाचीच इच्छा नाही. बोकडाला जस मालकाची आपल्यावर मर्जी आहे वाटून उड्या मारत जगत असते , आणि शेवटी कळतं , यान आपल्याला का सांभाळले , तसे वेळ गेल्यावर कळत शेतकऱ्याला उत्पादन वाढवायला का सांगीतले ते !
वर्षातून तीन तीन पीके घेऊन , पाणी पाजून पाजून , खत घालून घालून शेती नापीक होते , तरी पण प्रयोग कांही थांबत नाहीत . ज्याला त्याला विचारल तर म्हणतंय घरची शेती आहे , पडीक पाडायची काय ? आणि पळून पळून प्रयत्न करून उत्पन्न डब्बल करायच्या नादात कर्ज डब्बल कधी होते कळतच नाही. खर आहे रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आमचं मन सुन्न करीत नाहीत . कुणीही बोलायला तयार नाही.
शेती ही संस्कृती आहे , असे ऐकून ऐकून कान पिकले आहेत. शेती करणारा शेतकरी तिथेच मातीत गाडला जातो आहे .
बापाच्या छातीवर हात ठेवून झोपणाऱ्या मुलांना विचारा एकदा की , तू का ठेवतो छातीवर हात ? तेंव्हा त्याचं उत्तर येते की , बाप जिवंत आहे का ? हे चेक करावे म्हणून ठेवावा लागतो हात !
भयाण आहे हे सर्व आमच्या शेतीची पार वाट लावून टाकली इथल्या राजकीय सत्तेने !
शेतीवर कविता करणारे छान जगतात ,
शेतीवर कादंबरी लिहिणारे खुशाल जगतात,
शेतकरी आत्महत्या वर पुस्तक लिहिणारे सुद्धा मजेतच असतात
. शेती कशी करावी हे सांगणारे तर अधिकच मजेत आहेत
प्रत्यक्ष शेतीत राबणारा जीव मात्र कासाविस होतो आहे
त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर ही शोधू दिले जात नाही …
एक शेतकरी मित्र …
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा