*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
असाक्षर आणि स्वयंसेवक यांना प्रेरणा देणारी बारामती अन् सातारा येथील छायाचित्रे, रत्नागिरी येथील साक्षरता विषयक कलाकृती, कोल्हापूरच्या पथकाने हिंदीतून अफलातून सादर केलेला पोवाडा,साक्षरता विषयक उपक्रमांची माहिती देणारा सर्वसमावेशक स्टॉल तसेच अमरावती व गडचिरोली येथील स्वयंसेवक आणि असाक्षर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीने दिल्ली येथे सहा व सात फेब्रुवारी रोजी केंद्रशासनाने आयोजित केलेल्या उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या राष्ट्रीय मेळाव्यातील महाराष्ट्राचा सहभाग लक्षवेधी ठरला.
केंद्रीय शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने असाक्षर व नवसाक्षरांसाठी दोन दिवसीय 'उल्लास मेला'चे राष्ट्रीय बाल भवन नवी दिल्ली येथे आयोजन केले होते.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान,शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी,शिक्षण सचिव संजयकुमार,कौशल्य विकास सचिव अतुलकुमार तिवारी, एनसीईआरटीचे संचालक दिनेश कुमार सकलानी,शिक्षण सहसचिव अर्चना अवस्थी,अवर सचिव प्रदीप हेडाऊ,राष्ट्रीय साक्षरता केंद्राच्या प्रमुख उषा शर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी दहा वाजता मेळाव्याचे उद्घाटन झाले.
या मेळाव्यात देशातील केंद्रशासित प्रदेश व घटकराज्ये मिळून ३० राज्ये सहभागी झाली होती.योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांच्या निर्देशानुसार योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर,सहाय्यक योजना अधिकारी विराज खराटे, एससीईआरटी येथील राज्य साक्षरता केंद्राच्या प्रमुख डॉ. गीतांजली बोरुडे,अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव,रत्नागिरी येथील विशेष निमंत्रित अनन्या चव्हाण व तिचे पालक संतोष चव्हाण, अमरावती येथील असाक्षर देविदास जिकर व स्वयंसेवक नागसेन रामटेके,गडचिरोली येथील असाक्षर रमेश सोनटक्के व स्वयंसेवक नंदकुमार मसराम, कोल्हापूरच्या कलापथकातील प्रा. तुकाराम कुंभार यांचासह वीस जणांच्या महाराष्ट्र पथकात समावेश होता.
राज्याने उभारलेल्या स्टॉलमध्ये विविध उपक्रमांची माहिती,प्रशिक्षणे,स्वयंसेवक मार्गदर्शिका,उल्लास प्रवेशिका एक ते चार,कृतीपत्रिका, मूल्यांकन पत्रिका,प्रश्नपेढी,चला जाऊ गोष्टींच्या गावा आदि विकसित केलेले साहित्य ठेवण्यात आले होते.राज्यातील साक्षरता विषयक निवडक व्हिडिओ आणि फोटो,भित्तीचित्रे, माहिती पत्रके,राज्य शिक्षण परिषदेचे छायाचित्रे स्टॉलमध्ये दर्शवण्यात आले होती.अतिरिक्त सचिव डॉ.आनंद पाटील यांनी स्टॉलला विशेष भेट दिली.
नाशिक येथील मनपा शाळेच्या कुंदा बच्छाव या शिक्षिकेने तयार केलेले 'माझ्या आईला शिकायचं आहे ना!' हे व्हिडिओ गीत आणि बारामती येथील रुचिता क्षीरसागर हिने गायलेले 'हम मिलकर जुलकर लिखते पढते जायेंगे! हे व्हिडिओ गीत लक्षवेधक ठरले.परभणी येथील सुमनबाई चोखट या असाक्षर महिलेची मंजुषा आचमे या विषयसाधन व्यक्तीने घेतलेल्या मुलाखतीची चित्रफीतही प्रेरक होती.
मणक्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या व प्रत्यक्ष साक्षरता वर्गात न जाता घरीच साक्षरता वर्ग सुरू असलेल्या बारामती येथील ७२ वर्षीय सुशीला क्षीरसागर आणि त्यांची नात रुचिता क्षीरसागर यांचे प्रेरणादायी छायाचित्र केंद्रीय शिक्षण सचिव संजयकुमार यांना तर चिंचणी- सातारा येथील बबई मस्कर या ७६ वर्षीय महिलेचे साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाचे छायाचित्र सहसचिव अर्चना अवस्थी यांना समारोप कार्यक्रमात भेट देण्यात आले. कोल्हापूर डायटचे अधिव्याख्याता तुकाराम कुंभार व शाहीर आझाद नायकवडी यांच्या चमूने नव भारत साक्षरता अभियानावर हिंदीतून सादर केलेला पोवाड्याने उपस्थित यांची मने जिंकली. 'दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा' अशीच भावना महाराष्ट्रातील पथकात होती.
*नव भारत साक्षरता मोहिमेतील विद्यार्थ्यांना श्रेयांक*
शंभर टक्के साक्षरता प्राप्त करणे हे विकसित भारताचा महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांच्या जीवनात साक्षरतेमुळे नव्याने रंग भरले जात आहेत,त्यामुळे कार्यक्रमास लोकचळवळ बनवा.असे आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे.या अभियानात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी अस असाक्षरांना साक्षर केल्यास त्यांना क्रेडिट्स (श्रेयांक) दिले जातील अशीही घोषणा त्यांनी केली.प्रत्येक व्यक्तीने किमान एका असाक्षराला साक्षर करावे तसेच २१ व्या शतकात आवश्यक असलेली कौशल्ये जसे की डिजिटल साक्षरता आर्थिक साक्षरता येण्यासाठी प्रयत्न करावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा