Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

मेणबत्त्या कुठपर्यंत जाळायच्या......

 


मेणबत्त्या कुठपर्यंत जाळायच्या......


 We want justice,we want justice..save the saviours.... गेली सहा सात दिवस या घोषणा,banner, मोर्चा, candle march सर्व देशभरात सुरु आहे.. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पुर्ण झाली तरी आपण आज मुलींच्या सुरक्षेसाठी मोर्चे काढतोय.. हे आपले दुर्भाग्य... बेटी बचाव.. बेटी पढाओ... मोठ्या जल्लोषात सुरु आहे.. पण बेटी शिकतेय, प्रगती करतेय पण आपल्याच गावात, शहरात, राज्यात, देशात ती किती सुरक्षित आहे?... तिचं राहणं, तिचे कपडे, तिचं उशिरा येणं, तीचा मेकअप, तिचे मिञ.. या सगळ्या गोष्टीवर कायम नजर ठेऊन राहणारे आपलेच लोक, समाज समाज म्हणून आपणच त्यात असणारे सगळे... कधी आपला मुलगा, त्याचे मिञ, त्याची संगत, त्याचा दृष्टीकोन यावर कधी विचार करणार.....

             डॉक्टर... ज्यांना आपण देव मानतो, वेळ प्रसंगी देव पाण्यात ठेऊन जिथं काहीच होत नाही तिथं हेच डॉक्टर जादू करून माणसाचा जीव वाचवतात.. आज तीच डॉक्टर तिचं काम करून थकून शांत झोपली असताना... तिच्यावर जर असा अत्याचार होत असेल... त्याच कॅम्पस मधे... आणि याची कुणालाच खबर होत नसेल तर मग मुलगी नक्की कुठं सुरक्षित आहे... तीची चूक ती काय फक्त मुलगी असणे.... कमी कपडे असतील, उत्थान वागत असेल, मित्रांबरोबर फिरायला गेली असेल... म्हणून असं झालं असेल असे म्हणणारे आपण आता काय म्हणायचं.... आता तर ती डॉक्टर होती... जीव वाचवणारी होती... कर्तव्य करून येऊन झोपली होती..... त्यातही राजकारणी फक्त राजकारण करताय... तिचा postmortem report ऐकला तरी डोक्याला मुंग्या येतात... इतकी वैशियत, हैवाणी वृत्ती कशी असू शकते या गुन्हेगारात, पशू सुद्धा असं वागत नसेल...किती भावना शून्य... किती दुर्दैवी.... तीचा जीव गेला..... तो इतका सहज गेला असेल का? तिची स्वप्न, आकांक्षा, डॉक्टर झाल्यावर रुग्णाची,देशाची सेवा करण्याचं तिने घेतलेलं व्रत, आई वडील, बहीण भाऊ,त्यांच्या आठवणी,त्यांच्यासोबत घालवलेले क्षण....काय काय आले असेल तिच्या डोळ्यासमोर...ती ओरडत असेल, दया मागत असेल...जगण्याची भीक मागत असेल...काय काय केलं असेल तिने...किती झटापट पट केली असेल..पण या वासनांध नराधमांनी किती निर्दयपणे हे कृत्य केले असेल....जीव जाईपर्यंत...तीन तास तिच्या जीवाशी खेळ केला यांनी तेही हॉस्पिटल मधे.....सुरक्षितता कुठे आहे मग....निर्भया... निर्भया... म्हणत रोज त्याच बातम्या... तेच खुलासे... तीच पुरावे शोधण्याची प्रोसेस... आरोप, प्रत्यारोप,.. निर्लज्ज पने कबुली देणारा... गुन्हेगार... सगळं संताप आणणार.... अशीच परिस्थिती राहिली तर परत सामान्य माणूस मुलगी शिकवायला तयार होणार नाही... बाहेरगावी पाठवणार नाही.... तेच दुष्चक्र सुरु व्हायला किती वेळ लागेल..... विचार डोक्यात आला तरी मन सुन्न होते...

      पालकांनी मुलींना जितक्या restrictions देतो तितक्याच त्या आपल्या मुलांना द्यायला पाहिजे... माझा मुलगा कशा चार पोरी फिरवतो.. बुलट उडवतो.. थार गाडीत फिरतो.... याचा वृथा अभिमान बाळगणारे पालक काही कमी नाहीत.... शिकण्याच्या नावाखाली महागडे फोन घेणारी मुले दिवस रात्र त्यात नेमकं काय बघतात, हाताच्या बोटावर अश्लील चित्रपट, सिरीज, पोर्न व्हिडीओ पाहून तशीच कृत्य करणारी मुले आपल्याच आसपास आहेत हे सोयीस्कर रित्या डोळ्या आड होतायत,त्यांच्या चुका झाकून झाकून तो कधी असाच एखादा गुन्हा करेल हे कळणार नाही..... एकतर्फी प्रेम, चाळवलेली नजर, घाणेरड्या गप्पा, मित्रांची संगत, अशी कृत्य करायला भाग पाडणारी मिञकंपनी, मजा मजा म्हणून केलेली कृत्य कधी व्यसनात रूपांतर होइल सांगता येत नाही.. असा एखादा गुन्हा घडतो तेव्हा असे कित्येक गुन्हे त्या नराधमांनी आधी केलेले असतात,पचवलेले असतात, त्यामूळे पिपासू झालेलं, पिसाटल्यासारख तेच तेच कऱण्यात वेळ घालणारी ही टोळकी सराईत होतात आणि मग अशा अनेक निर्भया.... निष्पाप मुली यांची शिकार होतात..... आणि एखादी घटना समोर आली की निघाला कँडल मार्च, अधिवेशनात आरोप, प्रत्यारोप, राजकारण, दुसऱ्यांवर दोषारोप,.. अरे कठोर कायदे करा ना? घाला गोळ्या अशांना जागेवर... मेणबत्त्या जळण्यापेक्षा निर्घृण अत्याचार आणि खून करणाऱ्याला जाळा एकदा त्याच जागेवर.... नाही होणार असं कधी... मनातला संताप आणि आक्रोश आहे म्हणून असा विचार आला डोक्यात.. पण किमान तातडीने न्याय, निर्णय घेऊन दया ना त्याला फाशी..... देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षांनी सुद्धा आपलीं मुलगी सुरक्षित नाही.. आजही त्याच जुन्या धीम्या गतीने न्याय द्यायचा का?.... अशा किती निर्भया अजून होऊ द्यायच्या.... उरण ची घटना डोक्यातून जात नाही तोपर्यंत हे... फक्त बातम्या.. बातम्या.. सीबीआय कडे सोपवा.. याच्याकडे दया त्याच्याकडे दया.... शेवटी बातम्या थंडा वतात, लोकं विसरतात, कामाला लागतात... आरोपी सुटतात, काहींना कमी वय म्हणून सुट मिळते... पुन्हा तो गुन्हा करायला तयार... आता तर सुटून आलो म्हणून आणखी रुबाब, आणखी माज...त्यांच्या वागण्याला काय जाब... कुणाला वेळ.. पुन्हा एखादी निर्भया...

          छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्मलो वाढलो आपण... ज्या आपल्या राजांनी अशी चूक करणाऱ्यांची कधी गय केली नाही... हात छाटले, कडेलोट केलाय... आणि आज आपण फक्त मेणबत्त्या हातात घेऊन रस्त्यावर उतरतोय...कधीतरी या नराधमाना तात्काळ सजा मिळावी... त्या मुलीला न्याय मिळावा... खरं तर मला प्रश्न पडतो... कायच न्याय मिळणार तिला... जीव गमावून बसली.. मुलगी असण्याची शिक्षा... यातना भोगल्या तिने... आई वडील आयुष्यभराची भळभळणारी जखम उराशी घेऊन.. मीडिया विचारणा करेल... कोरडे पडलेल्या डोळ्यांनी ते उत्तर देतील... सीबीआय चौकशीत काय निष्पन्न होणार याची वाट बघणार.... कित्येक वर्ष जातील आणि न्याय मिळण्याची वाट बघतील..... त्याला फाशी झालीच..तर पुन्हा आपण मेणबत्त्या घेऊन तिला श्रद्धांजली वाहणार....... पुन्हा निर्भया... निर्भया..... अशा किती निर्भया... देव जाणे... सर्व डोकं सुन्न करणारं.....

             एक लेखिका म्हणून संवेदनशील मनाने  फक्त लिहण्यासाठी नाही हे... एक आई.... मुलींची आई... त्यांना शिकायला बाहेर पाठवणे... अशाच मनात भीती असणाऱ्या अनेक आई , त्यांची मानसिकता.... वडिलांना आपल्या मुलींची असणारी काळजी... रडता येत नाही... बोलता येत नाही... असा बाप... लेकीसाठी कासावीस असतोच मनातून... त्या सगळ्याच्या मनातील या भावना... दोन डॉक्टरांची मी आई.... आज पुरती हेलावून गेले..... लिहायचं असून हात थरथरत होते.... पण राहवेना... म्हणून हा लेखन प्रपंच......... नकोत हो नुसत्या या एक दोन दिवस पेटणाऱ्या मेणबत्त्या... सांगा ना आपल्या मुलांना चांगल्या वाईट गोष्टी.. दया समज त्यालाही आपल्या मुलींना देतो तशीच.. बनवा ना मुलगा देखील संवेदनशील, कळू दया ना त्याला प्रेम म्हणजे फक्त ओराबडणे नसते... भावना हळुवार जपणं म्हणजे प्रेम...एकतर्फी बिक्तर्फी नसतंच प्रेम..प्रेम मनापासून करा..तिच्या जीवावर बेत णारे नको...जीव लावा... जीव घेऊ नका .. आईबाप म्हणून कधी या गोष्टी पण सांगा हो आपल्या मुलाला, माझा मुलगा असा नाहीच.. असा विश्र्वास हवाच मुलांवर पण तरीही बाकी गोष्टींची जशी चर्चा होते ना तशीच मिञ म्हणून वयात आलेल्या मुलाला समजून सांगाच या गोष्टी... नक्की परिवर्तन होईल मुलांच्या विचारांत.... सुदृढ मन, निकोप विचार, प्रेमाची योग्य परिभाषा कळेल त्यांना.. कदाचित यातून त्यांच्या एखाद्या मित्राच्या विचारांमध्ये बदल करण्यात आपल्या मुलाचा मोठा वाटा असेल...... त्यातूनच वाचवतील ते अशा निर्भया होण्यापासून एखादीला.... आज रस्त्यावर उतरणाऱ्या मुलींबरोबर अनेक मुलं आहेत.. ते ही ओरडत आहेत जिवाच्या आकांताने.... देतायत साथ आपल्या मैत्रीणीना, भगिनींना... संवेदनशील मुले आहेतच की... त्यांच्याही डोळ्यात पाणी आहेच की....बोटावर मोजण्या इतक्या वाईट प्रवृत्तीच्या मुलांमुळे चांगली सुसंस्कृत मुले देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकतात ... त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.... गव्हाबरोबर किडे रगडल्या जातात.,..... सगळं दुष्चक्र..... कित्येक अतिशय हुशार असणाऱ्या मुली कदाचित शिकायला बाहेर पडणार नाहीत अर्थात पालक भीतीपोटी पाठवणार नाहीत... एक अत्युच्च बुद्धिमत्ता असणारी लेक पुन्हा चूल मुल यामध्ये अडकून पडेल....वाचवायला हवं हे आपण.....

     

      निर्भया.. निर्भया.. करून नुसत्या मेणबत्त्या पेटविण्यात काय अर्थ... आपल्या मनातली चांगल्या विचारांची, निकोप भावनांची ज्योत पेटवायला हवी.... आपल्या निष्पाप मुलींना, मुलांना सुदृढ मन आणि सुंदर विचारांचं देणं द्यायला हवं.... अशा निर्भया पुन्हा होऊच नयेत.... अशा घटनांवर घाणेरडे राजकारण होऊच नये...... थांबायला हवं हे कुठेतरी......अतिशय जड आणि दुःखद अंतःकरणातून केलेला आजचा हा लेखण प्रपंच......



             डॉ. उषा भोईटे पवार, निमगाव केतकी, इंदापूर.9890376649

लेखिका,व्याख्याता, इतिहास संशोधक, शिक्षणतज्ञ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा