*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक *मो. ९९२२४१९१५९*
महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण केले तरच शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन ठरेल असे मत प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी व्यक्त केले.
विद्या प्रतिष्ठान संचलित इंदापूर पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये महात्मा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. सुजय देशपांडे पुढे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज देखील दिशादर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचे प्रभावी आचरण करणे हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांनी वंचित व दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य भर संघर्ष केला.त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात समता, बंधुता व न्याय या मूल्यांची जपणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही मानवी मूल्ये जपणे हीच खरी प्रगती असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
यावेळी प्रा. सुनील शिंदे यांनी आपल्या भाषणात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्त्रीशिक्षण, शेतकरी हक्क व सामाजिक कार्याचा आढावा सादर केला. महात्मा फुले यांनी अंधश्रद्धा, जातीय भेदभाव व अन्यायाविरुद्ध आवाज उठवून समाजात जागृती निर्माण केली.
तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राजघटनेच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी सामाजिक न्याय, समानता व मानवाधिकार यांसाठी दिलेल्या लढ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर भर न देता सामाजिक जबाबदारीही पार पाडावी, असा अनमोल संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी कवाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. संतोष देवकाते यांनी विशेष प्रयत्न केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा