*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360
राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून महिला प्रदेश उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेली प्रभावी कामगिरी आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडलेल्या विविध जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या नावाकडे पक्षश्रेष्ठी गांभीर्याने पाहत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
विधानपरिषदेच्या या जागेसाठी भाजपमधील अनेक मातब्बर नेते इच्छुक असल्याने चुरस वाढली आहे. मात्र ऐनवेळी भाजपकडून ‘महिला कार्ड’ वापरत रश्मी बागल यांना संधी दिली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला होता. त्याच धर्तीवर भाजपकडूनही ‘सरप्राईज पॅटर्न’ राबवला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या कन्या असलेल्या रश्मी बागल यांनी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात प्रभावी नेतृत्व निर्माण केले आहे. महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी मोठे काम केले आहे. कार्यकर्ता मेळावे, महिला संवाद अभियान, सामाजिक उपक्रम आणि संघटनात्मक बैठका यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपचा जनाधार वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, ग्रामीण विकास आणि युवकांना राजकीय प्रक्रियेत सक्रिय करण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे महिला पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून ग्रामीण भागात भाजपच्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पक्ष कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने दिलेल्या विविध संघटनात्मक आणि सामाजिक जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे सांभाळल्या आहेत. महिला कार्यकर्त्यांचे संघटन, बूथस्तरावर पक्ष मजबूत करणे आणि ग्रामीण भागात पक्षविस्तार घडवून आणण्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांचे मार्गदर्शन आणि भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांच्या सहकार्यामुळे करमाळा व माढा मतदारसंघात भाजप संघटन अधिक मजबूत झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. युवकांना पक्षाशी जोडणे, सामाजिक उपक्रमांद्वारे जनसंपर्क वाढविणे आणि बूथस्तरावर संघटन बळकट करणे यामध्ये या नेतृत्वाची प्रभावी भूमिका दिसून येत आहे.
रश्मी बागल यांचा विधानसभा निवडणुकीत अवघ्या २५१ मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांच्या हक्काची सुमारे सहाशे मते बाद ठरल्याची चर्चा झाली होती. यासंदर्भात हायकोर्टात खटलाही दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्या निवडणुकीपासूनच त्यांच्या नेतृत्वाकडे ताकदवान पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपच्या महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे तसेच रश्मी बागल यांच्या प्रभावी वक्तृत्व कौशल्य, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि मजबूत संघटनशक्तीमुळे त्यांची दावेदारी अधिक मजबूत बनली आहे. आगामी काळात करमाळा आणि माढा मतदारसंघात भाजपला अधिक बळकटी देण्यासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे मत व्यक्त होत आहे.
यावेळी बोलताना रश्मी बागल म्हणाल्या, “सामान्य नागरिकांचे प्रश्न विधानभवनात प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. महिलांना राजकारणात अधिक संधी मिळाव्यात, ग्रामीण भागातील प्रश्नांना न्याय मिळावा आणि शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी मी सातत्याने कार्यरत राहणार आहे.”
त्यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे आणि पक्षातील सक्रिय भूमिकेमुळे विधानपरिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र होत असून विविध सामाजिक संस्था, महिला बचतगट, युवक संघटना आणि भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा