*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
शेती पिकांसह फळबागा व मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे एक गुंठाही न ठेवता तातडीने करून शासनास अहवाल सादर करावा असा आदेश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांना दिला.
नरसिंहपूर परिसरातील गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, टणू, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, सराटी, बावडा, वकिलवस्ती आदि गावात काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेती पिके, फळबागा तसेच काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित भागाला अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तर अनेक शेतकऱ्यांनी वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची व्यथा मांडली. त्यानंतर कृषीमंत्र्यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचा एक गुंठाही न ठेवता तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांनुसार मदत मिळावी, यासाठी पंचनामे तातडीने व अचूक करण्यात यावेत, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच नुकसानग्रस्त भागातील परिस्थितीवर प्रशासनाने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून डाळींब, आंबा, नारळ फळपिकासह ऊस, कडवळ आदिंचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
पाहणी दौऱ्यावेळी प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, प्रताप पाटील, सुरेश शिंदे, तहसीलदार जिवन बनसोडे, जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, राणी खर्डे, शेळके मॅडम, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : नरसिंहपूर परिसरात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व संबंधित अधिकारी.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा