*यशवंतनगर-- प्रतिनिधी*
*नाझिया. मुल्ला*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
स्वातंत्र्याच्या अमृततेजाने उजळलेल्या वातावरणात, देशभक्तीच्या जयघोषाने आसमंत भारून टाकत महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला तसेच महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग, यशवंतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. श्री. डॉ. सचिन शिर्के (एम.डी. कार्डिओलॉजिस्ट) तसेच मा. श्री. डॉ. अमोल आव्हाड (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, यशवंतनगर) , संकुलाचे मार्गदर्शक अॅड. नितीनराव खराडे उपस्थित होते.
भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना वंदन करून ध्वजारोहणाचा पवित्र सोहळा संपन्न झाला. नभांगणात डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला मानवंदना देताना उपस्थितांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत अधिक प्रज्वलित झाली. “विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊँचा रहे हमारा” या भावनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी वातावरणात राष्ट्रभक्तीचा स्वर भरला. राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताच्या सामूहिक सादरीकरणाने कार्यक्रमाला मंगलमय आणि राष्ट्रनिष्ठ स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमात बालवीर व वीर बाला यांच्या पथकाने सादर केलेल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर झालेल्या सामुदायिक कवायतीने विद्यार्थ्यांची शिस्त, एकजूट, आत्मविश्वास आणि संघभावना यांचे प्रभावी दर्शन घडविले. प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी सर्व भारतवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थी व राज्यस्तरीय नैपुण्य प्राप्त खेळाडू यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच रत्नाई नागपंचमी पारंपारिक समूहगीत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या महर्षि प्रशालेतील सर्व कलाकारांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न झाला. लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर या प्रशालेने पारंपारिक समूहगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सर्व कलाकारांचा सन्मान व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
प्रमुख अतिथी डॉ.सचिन शिर्के एमडी कार्डिओलॉजिस्ट यांनीआपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून सांगत, देशाच्या प्रगतीत भावी पिढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. “स्वातंत्र्य हे केवळ अधिकारांचे प्रतीक नसून कर्तव्यांचीही जाणीव आहे,” हा संदेश त्यांनी आपल्या प्रेरणादायी विचारांतून दिला. विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी शिस्त व आरोग्य आणि व्यायाम यांची त्रिसूत्री सांगितली.
सदर कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे, अनिल जाधव मुख्याध्यापक शिवाजी पारसे, मुख्याध्यापिका अनिता पवार उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी, पर्यवेक्षक उमेश बोरावके सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी “सामूहिक गीत – सारे जहाँ से अच्छा…” या देशभक्तिपर गीताने वातावरण भावविभोर झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका नाझिया मुल्ला यांनी केले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा