पुणे, श्रमण संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
दक्षिण पुण्यातील जैन बांधवांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद दरबार, दत्तनगर कात्रज येथे राष्ट्रसंत आचार्य भगवंत प.पू. श्री. आनंदऋषिजी महाराज यांच्या १२६ व्या जन्मजयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा जय आनंद, आनंदऋषीजी महाराज यांच्या जयघोषात संपन्न झाली. यानिमित्त आयोजित विविध धार्मिक, सामाजिक आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आचार्य आनंदऋषिजी महाराज यांचे सर्वसमावेशक विचार तसेच सामाजिक कार्याच्या प्रेरणेला अभिवादन करत भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी १४ शुभचिन्हधारी चरणकमल पादुकांचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. श्री. संदीप बेलदरे यांच्या निवासस्थानापासून आंबेगाव रोडमार्गे आनंद दरबारपर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात झालेल्या या मिरवणुकीचा समारोप आनंद दरबार येथे झाला. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादीचा लाभ घेतला.
दुपारी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. दक्षिण पुणे वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय योगदाना बद्दल ह.भ.प. श्री. गुरुवर्य माऊली जनार्दनजी जंगले यांना ‘दक्षिण वारकरी पुण्यभूषण पुरस्कार’, श्री. चक्रधर विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. महेंद्र संजय कोंढरे यांना ‘सरस्वती भूषण पुरस्कार’, तर प्रा. श्री. बाजीरावजी गायकवाड यांना ‘गुरुआनंद कार्यक्षम पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे, नगरसेवक संदीप बेलदरे, व्यंकोजी खोपडे, नगरसेविका सौ. सीमा युवराज बेलदरे, सौ. स्मिता सुधीर कोंढरे, सौ. प्रतिभा रोहिदास चोरगे, ह.भ.प. गणेश महाराज भगत, ह.भ.प भगवानराव मांगडे, भगवान खेडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
महाप्रसादीचे भाग्यशाली मानकरी श्रीमती लीलादेवी बन्सीलाल ओस्तवाल आणि अनिल मनोज ओस्तवाल, मार्केटयार्ड, पुणे हे होते.
यावेळी माजी आमदार उल्हासदादा पवार म्हणाले, आचार्य आनंद ऋषीजी महाराज हे आपल्या प्रवचनात संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा आवर्जून उल्लेख करत. त्यामुळे जैन धर्म आणि वारकरी संप्रदाय याचे अनोखे नाते निर्माण झाले. संत आणि महंत हे जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देतात मात्र त्यांना आता दुर्दैवाने जातीधर्मापुरते सीमित करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आचार्य आनंऋषींजी महाराज यांनी अध्यात्म, मानव सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा दिलेला संदेश आजही समाजाला प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हीच त्यांच्या विचारांना खरी मानवंदना आहे. पुरस्कारप्राप्त व्यक्तिमत्व हे समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात या शब्दात त्यांनी त्यांचे कौतुक केले.
आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थित मान्यवर, पुरस्कारार्थी, भाविक भक्त आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीते साठी दत्ताजी कामठे,राजुशेठ वर्मा, माऊली लिपाणे, दिलीप संचेती, संतोष भंडारी, संतोष दुगड़ , सुभाष पिरगळ, प्रकाश भटेवरा,सौरभ धोका यांच्यासह सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा