Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १३ सप्टेंबर, २०२६

*मंगरुळ येथे दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी दोन तास रास्ता रोको* *कोरडा दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकरी आक्रमक*

*मंगरुळ--. प्रतिनिधी*. *चांदसाहेब शेख* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शेतकऱ्यांनी अक्कलकोट - तुळजापूर या मुख्य रस्त्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यंदा पावसाने दडी मारल्याने मंगरुळ परिसरातील सोयाबीन, उडीद, तूर ही खरीप पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. पाझर तलाव, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. सकाळी १० ते १२ या दोन तासात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी शेतकऱ्यांनी "दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे" अशा घोषणा दिल्या. *शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :* १) मंगरुळसह तुळजापूर तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा. २) नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून पीक विमा मिळावा. ३) गावात टँकरने पाणीपुरवठा आणि चारा छावण्या सुरू कराव्यात. आंदोलनस्थळी तुळजापूरचे मंडळ अधिकारी व पोलीस प्रशासन दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून वरिष्ठ पातळीवर मागणी कळवू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. या आंदोलनात मंगरुळ व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा