*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
पिंपरी : मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी, पाठिंबा दिलेला नाही. कोणीही समाजाचे, माझे नाव वापरू नये. उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे व्हा, त्यात मोठा विजय आहे. सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल, त्याच्या बाजूने उभे रहा, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष असून, तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे पाटील रविवारी पुणे, पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पिंपरी- चिंचवडमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. समाजाच्या मनात खदखद आहे. आरक्षण देऊ म्हणाले, पण दिले नाही. शासनाने धोका दिला आहे. त्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री जबाबदार आहेत. सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढून अंमलबजावणी केली नाही. ५७ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष आहे. तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल. आमचा मार्ग हा राजकीय नाही. आम्हाला आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही, किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. मराठा समाज हुशार आहे. समाजच ही निवडणूक हातात घेऊन ज्या पाडायचे आहे त्याला पाडेल, असे त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा