इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल- 8378081147
-- इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व तालुका मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने निमगाव केतकी येथील केतकेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये बुधवारी (दि. १५) मुस्लिमधर्मीय ६ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा (इस्तमा-ए-शादी) मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्यास मुंबई, पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली जिल्ह्यातील तब्बल ५ हजारांहून अधिक वन्हाडी मंडळींनी उपस्थिती लावली.
इंदापूर चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम संघटना गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा आयोजित करीत आहे. याशिवाय दुष्काळी परिस्थितीत वन्यजीवांसाठी टँकरने पाणी वाटप, चारा वाटप, रक्तदान शिबिर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला अन्नदान व शिरकुर्मा वाटप, महापुरुषांच्या जयंती उत्सवात सरबत बाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर सत्कार व शालेय साहित्य बाटप, त्यांना मार्गदर्शनपर शिबिर घेतले जातात, असे सामाजिक उपक्रम यापुढेही कायम चालू ठेवणार असल्याचे ट्रस्टचे सचिव मुक्तार मुलाणी यांनी सांगितले.
सामुदायिक विवाह सोहळ्यातील धार्मिक विधी मौलानांच्या उपस्थितीत काझींनी विधिवत पार पाडले. यावेळी नव वधू-वरांना कपडे, संसारोपयोगी वस्तु, भांडी, धार्मिक साहित्य, वन्हाडी मंडळींना जेवण देण्यात आले. विवाह सोहळ्यास भलामोठा शामियाना उभारण्यात आला होता.
कर्मयोगी व निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, पृथ्वीराज जाचक, मयूरसिंह पाटील, देवराज जाधव, महारुद्र पाटील, अंकुश जाधव, कमाल जमादार, सिकंदर मुलाणी, दत्तात्रय चांदणे, संदीप भोंग आदी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधू-वरांस शुभेच्छा दिल्या तसेच चॅरिटेबल ट्रस्ट व युवक संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा