*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- नीरा नदीवरील नरसिंहपूर ( ता इंदापूर ) - संगम ( ता. माळशिरस ) यांना जोडणारा बंधाऱ्यात ढापे टाकून पाणी अडवण्यात आला आहे. त्यामुळे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेकडो एकर शेतीला उन्हाळ्यात काहीसा दिलासा मिळाला आहे.
नरसिंहपूर ( ता इंदापूर ) व संगम ( ता माळशिरस ) यांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मागील २६ वर्षांपासून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व बंधारा लगतहून अति वाळू उपशामुळे नादुरुस्त झाला होता. त्यानंतर दोन ते तीन वेळा अतिवृष्टीच्या पुराच्या पाण्याच्या रेट्यामुळे स्लॅब व पिलर तुटल्याने बंधारेचे मोठे नुकसान झाले होते. त्यावर अनेकदा वरवरच दुरुस्ती करण्यात आल्याने बंधारेची परिस्थिती अधिकच बिघडत गेली होती.
तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत नरसिंहपूर साठी २६० कोटींचा निधी मंजूर केला. त्यामध्ये सदर बंधारेचा समावेश करुन दहा कोटी रुपयांचा निधी स्वतंत्रपणे बंधारेसाठी म्हणून मंजूर केला होता. यासाठी तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सतत पाठपुरावा करून जुना बंधारा पाडून नव्याने बंधाऱ्याची दोन वर्षांपूर्वी उभारणी पूर्ण करून २६ वर्षांनंतर त्यामध्ये पाणी अडवले.
नव्याने उभारलेल्या बंधाऱ्यात मागील वर्षी प्रथमच पाणी अडविण्यात आले. परंतू पावसाळा संपल्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पाण्याच्या रेट्यामुळे बंधार्याचा एका बाजूचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात भराव टाकून पाणी अडवण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षी शेतीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नीरा नदीवरील संगम बंधाऱ्यामुळे इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, आडोबावस्ती, गिरवी तर माळशिरस तालुक्यातील बाबुळगाव, संगम, गणेशगाव आदि गावातील शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. मागील २६ वर्षापासून बंधाऱ्याच्या नादुरुस्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु यावर्षी बंधाऱ्यात पाणी आवडल्यामुळे शेतीमधून उत्पन्न घेता येणार असल्यामुळे शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
फोटो - नरसिंहपूर -संगमला जोडणारा नीरा नदीवरील बंधाऱ्याला ढापे टाकून पाणी अडवण्यात आले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा