*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
मुंबई:-शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारीदरम्यान कोणत्याही अपघातात एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून ४ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासंदर्भातले नवे परिपत्रक महसूल विभागाने आज जारी केले आहे.
यंदाच्या वारीसाठी ही योजना 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत लागू राहणार आहे. या काळात एखाद्या वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ही मदत दिली जाईल. मात्र, आत्महत्या, विषबाधा (स्वखुशीने), किंवा खून यासारख्या घटनांमध्ये ही मदत मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, अपघातामुळे वारकऱ्यांचे अपंगत्व झाल्यासही सरकारने आर्थिक मदतीची तरतूद केली आहे.
*मदतीची तरतूद काय?*
*अपघाताने व दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांस 4 लाखांची मदत*
*वारीदरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास 74,000*
*60 टक्क्यांवरून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाख*
*एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पीतळात दाखल झाल्यास 16000 रुपये*
*एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास 5400 रुपयांची मदत*
*वारीमध्ये उत्साह आणि श्रद्धेच्या पलीकडेही अनेक धोके दडलेले असतात. अपघात, थकवा, आजारपण, या सर्व गोष्टी वारकऱ्यांच्या प्रवासात अडथळा ठरतात. अशा वेळी शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीमुळे वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही शासनाने सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिरं, कार्डियॅक रुग्णवाहिकांची व्यवस्था, आणि पंढरपूरमध्ये तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आंबिटकर यांना स्वतः पंढरपूरला जाऊन सर्व तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिंड्यांसोबत पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवाव्यात, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा