इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथे ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेतून विद्यार्थिनींना स्वसंरक्षण व सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये महिला सुरक्षा, कायदेशीर हक्क, स्वसंरक्षण आणि सक्षमीकरण यासंदर्भात जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे अध्यक्ष स्व. शंकरराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रा. स्वाती राऊत यांनी सादर केलेल्या पुणे विद्यापीठ व महाविद्यालय गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा. मयुरी जामदार यांनी कार्यशाळेची रूपरेषा मांडून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या, सौ. सविता व्होरा म्हणाल्या, महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी महिला शिक्षणाच्या आद्यप्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना आपला आदर्श मानत असल्याचे सांगितले. शारीरिक सबलता अत्यंत महत्त्वाची असून मुलींनी नियमित व्यायाम करून शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मुलींविरुद्ध वाढत्या गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त करत सतर्क आणि जागरूक राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. शिक्षण, मानसिक बळकटी आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा समन्वय साधल्यास प्रत्येक मुलगी सक्षम होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
दुसऱ्या प्रमुख पाहुण्या सौ. माधुरी लडकत ( निर्भया पथक, इंदापूर ) यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीविषयी माहिती देत महिलांशी संबंधित घटनांचा आढावा घेतला. प्रत्येक मुलगी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.आपत्कालीन प्रसंगी तात्काळ मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगून “गुन्हे संपवले तरच गुन्हेगार संपतील असा संदेश त्यांनी दिला. अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले, युवती व महिलांनी आपली आत्मनिर्भरता सिद्ध केली आहे. मात्र त्यांनी अन्याय, अत्याचार विरोधात निर्भीडपणे पुढे येणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे.
या प्रसंगी अश्विनी
भोंगळे आणि मोहिनी कांबळे या विद्यार्थिनींनी लाठीकाठी स्वसंरक्षण कलेचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
द्वितीय सत्रात प्रा. आत्माराम फलफले यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट करत दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दत्तात्रय गोळे, डॉ. भरत भुजबळ, प्रा. तानाजी कसबे, प्रा. प्रज्ञा लामतुरे व प्रा. सदाशिव उंबरदंड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिव्या जाधव यांनी तर प्रा. मुक्त पिसे यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थिनी यांचे आभार मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा