*पुणे, डॉ. संदेश शहा*.
*सहसंपादक. टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:- ९९२२४१९१४९*
अखिल प्राणिमात्रांमध्ये मानवी जीवन दुर्लभ असून भगवान महावीर यांच्या अहिंसा व सेवा परमो धर्म या तत्वाने मानवी जीवन सार्थक करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आचार्य परम पूज्य विजयरावजी महाराज साहेब यांचे सुशिष्य संवेगमुनीजी महाराज साहेब आदी ठाणा यांनी केले.
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, दत्तनगर पुणे यांच्या वतीने आनंद दरबार येथे आयोजित गुढीपाडवा व मराठी नववर्ष मंगलपाठ कार्यक्रमात आशीर्वाद देताना ते बोलत होते.
परम पूज्य
संवेगमुनीजी महाराज साहेब पुढे म्हणाले, दया हे धर्माचे मूळ आहे असे म्हणतात. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय या संसारातून मुक्ती असून त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष मिळवण्यासाठी प्रत्येकास विविध टप्पे पार पाडावे लागतात. तप, ज्ञान, विज्ञान, संयम आदी त्याचे विविध टप्पे आहेत. मात्र त्यासाठी संत सत्संग हा महत्त्वपूर्ण आहे. प्रपंचात दुःख आहे मात्र धर्म साधनेत सुख आहे. त्यामुळे आपल्या मुलांवर देखील लहानपणा पासून धर्मसंस्कार केल्यास त्याचे कर्म व्यवस्थित होतील असे सूतोवाच त्यांनी केले.
यावेळी त्यांनी तीन मूर्तीचे मुल्य यासंदर्भात सुंदर रूपक मांडून उत्तम धर्मप्रभावना केली.
यावेळी जैन श्रावक, श्राविका यांनी सर्वश्रेष्ठ महामंत्र नमोकार मंत्राची सामूहिक आराधना करून एकमेकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नववर्षाचे महामांगलिक श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब धोका, सर्व विश्वस्त, प्रभावना सौ. भक्ती हर्षद संचेती परिवार यांनी केले. यावेळी जैन श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा