*सलीमखान पठाण*
*श्रीरामपूर*
*९२२६४०८०८२*
पवित्र रमजान महिना आता आपल्या अंतिम चरणाकडे आगेकूच करीत आहे.थोडे दिवस शिल्लक असल्याने प्रत्येकजण या महिन्याचे अधिकचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी कार्यरत आहे. जकात अदा केली जात आहे.गोरगरिबांना मदत दिली जात आहे.क्षीरखुर्माच्या सामानाची काही प्रमाणात तयारी होत आहे.कुरआन पठण वेगाने होत आहे. रमजान महिना पूर्णत्वास जात असताना खूप लवकर महिना गेल्याबद्दल दुःख होत आहे.हजरत पैगंबर रमजान च्या शेवटच्या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ इबादत साठी देत होते.त्यांचे अनुकरण अनेकजण आज करीत आहेत
हजरत उस्मान बिन अफ्फान ( रजिअल्लाह ताआला अन्हो) उर्फ हजरत उस्मान गणी हे इस्लामी राजवटीचे तिसरे खलिफा होते.हजरत पैगंबरांचे अत्यंत विश्वासू. पैगंबरांच्या प्रत्येक शब्दाला मान देणारे.खूप श्रीमंत होते. परंतु ह्रदयात दातृत्व ही तेवढेच होते. इस्लाम धर्मासाठी स्वतःची सर्व संपत्ती त्यांनी अर्पण केली.ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी लागेल तेवढी संपत्ती त्यांनी दान केली.मोठे व्यापारी होते.एकदा दुष्काळ पडलेला असताना लोक उपाशी मरू लागले.तेव्हा हजरत पैगंबरांनी सांगितले की आहे का कोणी जो उपाशी लोकांची मदत करुन जन्नतचा हक्कदार होईल.हे ऐकून हजरत उस्मान यांनी आपल्या जवळील हजारो टन धान्य गोरगरिबांना मोफत वाटले.कुठेही फोटो काढला नाही कि पोस्टर छापले नाही.फक्त अल्लाहची मर्जी संपादन करणे एवढाच त्यांचा उद्देश होता.मदिना मध्ये एकदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली.एका यहुदीकडे पाण्याची विहीर होती.तो पाणी विकत देत होता.लोकांकडे पाणी विकत घ्यायला देखील पैसे नव्हते. हजरत उस्मान यांनी अर्धी विहीर त्याच्याकडून विकत घेतली.एक दिवस विहीर त्याच्याकडे एक दिवस यांच्याकडे होती.ज्या दिवशी विहीर हजरत उस्मान यांचे ताब्यात असायची त्या दिवशी सर्व लोक मोफत पाणी भरायचे.दुसऱ्या दिवसाचे पण भरून ठेवायचे. परिणामी यहुदीकडे जो दिवस असायचा,त्या दिवशी कोणीच पाणी भरायला येतच नव्हते.त्यामुळे त्याने अर्धी विहीर ही यांना विकून टाकली.त्यांनी ती ही खरेदी करुन जनतेसाठी खुली करून टाकली. हजरत उस्मान यांनी कुरान शरीफ चे पुर्नलेखन करून घेऊन त्याच्यावर विरामचिन्हे लावली.म्हणजे लोकांना शुद्ध उच्चार करण्यास सुलभता निर्माण झाली.त्यांचे व्यक्तिमत्व खूप सुंदर होते. दानधर्म करताना त्यांनी कधीही मागचा-पुढचा विचार केला नाही.सातत्याने गरिबांना मदत केली.आज दहा रुपयाची साबण देताना फोटो काढून प्रसिद्धी द्यायची सवय आपल्याला लागली आहे.परंतु त्यांनी अशी कोणतीही प्रसिद्धी कधीही केली नाही.दानधर्म करण्यासाठी मनाचा जो मोठेपणा हवा,तो त्यांच्याकडे होता.इस्लामी जीवन प्रणालीचा त्यांनी पूर्णपणे स्वीकार करून आदर्श निर्माण केला.(क्रमशः)
*सलीमखान पठाण*
*श्रीरामपूर*
*९२२६४०८०८२*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा