*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
एस.आय.आर. प्रक्रिया राबविण्यासाठी देण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे, पत्ते आणि वयात चुकाच चुका असून असंख्य मृतांची नावे सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने एस.आय.आर. प्रक्रिया राबविण्या अगोदर सदोष मतदार याद्या दुरुस्त करा अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आपल्या भारत देशात एस.आय.आर. अर्थातच स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत देण्यात आलेली आहे. अर्थातच या मुदतीप्रमाणे आता या प्रक्रियेला फक्त १५ दिवसांचा कालावधी उरला आहे. तरीही ही प्रक्रिया राबविण्यासाठी नेमणूक केलेले बी.एल.ओ. अजूनही घरोघरी पोहोचलेले नाहीत. अनेक बी.एल.ओ. तर कुठल्यातरी एखाद्या प्रभागातील एखादी शाळा किंवा एखाद्या नगरसेवकाचे घर किंवा एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचे घर पाहून तिथे बसल्या बसल्या मतदारांची जी माहिती मिळेल ती घेऊन ही प्रक्रिया उरकून घेण्याचे कार्य करीत असल्याचे दिसून आले आहे.
वास्तविक पाहता प्रत्येक बी.एलओ. ने प्रत्येक घरात जाऊन एकूण एक मतदाराची नोंद या एस.आय.आर. प्रक्रिये मध्ये घेणे आवश्यक असताना असे होताना दिसत नाही.
शिवाय सन २०००, २००२, २००५ किंवा गेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदारांची यादी, यापैकी कोणतीही यादी असो त्यात मतदारांची नावे अत्यंत चुकीची, पत्ते चुकीचे आणि वयही चुकीचे अशा प्रकारच्या सदोष याद्या घेऊन बी.एल.ओ. हे एस.आय.आर. प्रक्रियेसाठी कार्य करीत आहेत.
सदोष याद्यांमुळे मतदारांचे मॅपिंग होत नसल्याने मतदारांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
खरे तर एस.आय.आर. सारखी प्रक्रिया राबविण्या अगोदर मतदार याद्या कोणत्याही असो त्या संपूर्ण अचूक आणि दुरुस्त करून घेणे आवश्यक असताना सदोष मतदार याद्या घेऊन एस.आय.आर. प्रक्रिया राबवली जात आहे.
शिवाय सन २००० पासून ते आतापर्यंत मयत झालेल्या असंख्य मृत मतदारांची नावे सुद्धा आजही मतदार याद्यांमध्ये समाविष्ट आहेत.
या अशा गंभीर बाबी लक्षात घेता ही प्रक्रिया राबविण्या अगोदर संपूर्ण भारत देशातील मतदार याद्या अगोदर दोष मुक्त करून घेण्यात याव्यात.
जेणेकरून मतदारांची नावे, पत्ते आणि वयांची अचूक माहिती घेवून ती मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात यावी. त्यानंतरच ही एस.आय.आर. प्रक्रिया राबविण्यात यावी. अशी मागणी एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा