*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने बुधवारी दिल्लीतून देशव्यापी घर-घर गॅरंटी अभियानाची सुरुवात केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते उत्तर पुर्व दिल्लीतून या अभियानाची सुरुवात केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पुर्ण केली नाही, असा आरोपही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला.
या मोहीमेची सुरुवात करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, या अभियानाअंतर्गत काँग्रेसचे कार्यकर्ते देशभरात घरोघरी जाऊन पाच न्यायाशी संबंधित २५ गॅरंटी असलेली पत्र वितरित करतील आणि याबाबत लोकांमध्ये जणजागृती करतील. तसेच केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास या सर्व गॅरंटीची अंमलबजावणी केली जाईल, आमचे सरकार सदैव गरिबांच्या पाठीशी राहील आणि गरिबांसाठी काम करेल. काँग्रेसने युवक, महिला, कामगार, शेतकरी आणि सामायिक न्याय अंतर्गत २५ गॅरंटी दिल्या आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन या गॅरंटी देशातील जनतेपर्यंत पोहोचवतील, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ खोटी आश्वासने देत असल्याचा आरोप करत खर्गे म्हणाले की, आजपर्यंत मोदींनी दिलेली एकही गॅरंटी पुर्ण केली नाही. तर काँग्रेसच्या गॅरंटी अंतर्गत ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. शिक्षित तरुणांना वार्षिक १ लाख रुपयांचे प्रशिक्षण दिले जाईल. पेपरफुटी रोखण्यासाठी कायदे आणि धोरणे बनवली जातील. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी दिली जाईल. कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी आयोगाची स्थापना केली जाईल. पीक नुकसान झाल्यास थेट खात्यात ३० दिवसांच्या आत पैसे हस्तांतरित केले जातील. शेतकऱ्यांच्या सल्ल्याने नवे आयात-निर्यात धोरण तयार केले जाईल. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींवरून जीएसटी हटवला जाईल. तसेच इंडिया आघाडीचे सरकार आल्यास काँग्रेस पक्षाद्वारे दिलेल्या इतरही सर्व गॅरंटी पूर्ण केल्या जातील, असे आश्वासनही खर्गे यांनी दिले. यावेळी खर्गे यांच्यासह दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली, काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांच्यासह प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा